हरिनामाच्या गजरात भक्तीच्या मेळाव्याला भव्य प्रारंभ
पनवेल/ आदिवासी सम्राट :
दानशूर, समाजसेवक आणि माणुसकीचा धर्म अखंड जपणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कीर्तन महोत्सवा’ला हरिनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात व भक्तीमय वातावरणात भव्य प्रारंभ झाला. खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला पनवेल, उरण, कर्जत, खालापूर परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. संत परंपरेचा महिमा आणि अध्यात्मिक वारसा जपणाऱ्या या महोत्सवात नामवंत भजन गायक व कीर्तनकारांनी हजेरी लावत भाविकांना भक्तिरसात विलीन केले. या भक्तिपर्वाचा उद्देश केवळ धार्मिक नसून समाजामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि संस्कार रुजवण्याचा आहे.
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सामाजिक योगदान आणि त्यांची लोकनेते म्हणून असलेली प्रतिमा या निमित्ताने अनेकांनी गौरवली. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अध्यात्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून रोजी ७४ वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्या अनुषंगाने वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमे आयोजित करण्यात आले असून त्याचा शुभारंभ संतांच्या वाणीच्या गोडव्याने झाली. तीन दिवस म्हणजेच ०२ जून पर्यंत हा भव्य स्वरूपात ‘कीर्तन महोत्सव’ होणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर दानशूर व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण देशात ओळखले जातात. त्यांचे सर्व समाजासाठी योगदान नेहमीच आदर्शवत आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन व अर्थसहाय्य करत त्यांनी सामाजिक बांधिलकी कायम जपली आहे. अध्यात्मिक क्षेत्रातही त्यांचे कार्य महत्वपूर्ण असे आहे, मंदिरांची उभारणी, मंदिराचे जिर्णोद्धार तसेच दिंडीसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सढळ हस्ते मदत करत असतात, त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा अध्यात्मिक सोहळा मोठ्या प्रमाणात उत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे, यासाठी वारकरी संप्रदायातील व्यक्तींनी पुढाकार घेतला. त्या अनुषंगाने वारकरी सांप्रदायातील अनेक गुरुतुल्य व्यक्तींच्या प्रमुख उपस्थितीत या कीर्तन महोत्सवाची सुरुवात हरिनामाच्या गजरात प्रतिमा पुजा, वीणा, टाळ आणि पखवाज पूजनाने झाली. त्यानंतर रायगड भूषण पं. उमेश चौधरी यांचे सुश्राव्य भजन संपन्न झाले. पनवेल, उरण, कर्जत, खालापूर परिसरातील ४७ हरिपाठ मंडळांचे सामुदायिक हरिपाठ अखंड भक्तिभावात झाले, यामध्ये वारकरी सांप्रदायातील महिला वर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणात व लक्षणीय होती. त्यानंतर सायंकाळी आदरणीय गुरुतुल्य सत्कारमूर्ती कीर्तनकार महाराजांचा सत्कार सोहळा, आणि त्यानंतर ह.भ. प. उमेश महाराज दशरथे (परभणी) यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले होते.
या महोत्सवाच्या शुभारंभाला प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, दिबासाहेबांचे चिरंजीव अतुल पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सदगुरु आप्पा माऊली यांचे चिरंजीव ह. भ. प. विष्णु दादा मांगरुळकर, संत तुकाराम महाराज पायी कोकण दिंडी अध्यक्ष ह. भ. प. पद्माकर महाराज पाटील, बांठिया सप्ताह अध्यक्ष ह. भ. प. धाऊशेठ पाटील, राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. सुरेश महाराज पाटील, भजनसम्राट ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी, महाराष्ट्र वारकरी महामंडळ रायगड जिल्हाध्यक्ष ह. भ. प. पुंडलिक महाराज फडके, रायगड भूषण ह. भ. प. नारायणबुवा महाराज, अनंतबुवा महाराज पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी महापौर कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका सुशीला घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, अमित जाधव, माजी नगरसेवक जयंत पगडे, मनोहर म्हात्रे, गणेश कडू, अजय बहिरा, एकनाथ गायकवाड, तेजस कांडपिळे, प्रभाकर बहिरा, सुनील बहिरा, मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, भूपेंद्र पाटील, विकास घरत, कामगारनेते प्रभुदास भोईर, जितेंद्र म्हात्रे, प्रवीण पाटील, हॅप्पी सिंग, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, रोहित जगताप यांच्यासह वारकरी संप्रदायातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———-
“कीर्तन महोत्सव” म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जागर करणारा एक भव्य कार्यक्रम. हा एक पारंपरिक उत्सव आहे जो महाराष्ट्रात आणि इतर मराठी भाषिक भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यामुळे त्याचे महत्व आणि मान्सून पूर्व पावसाची हजेरी लक्षात घेता येथे येणाऱ्या वारकरी सांप्रदायातील मंडळींना या भक्तीसंगम मेळाव्यात कोणतीही कमी भासू नये यासाठी आयोजकांकडून उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. किमान तीन हजार लोकांची बैठक व्यवस्था असलेल्या या ठिकाणचा मंडप वॉटरप्रूफ पद्धतीचा उभारण्यात आला आहे. त्याचबरोबरीने या ठिकाणी संतांच्या मूर्ती व प्रतिमा आकर्षक अशा होत्या. मंडपामध्ये संतांच्या आकर्षक मूर्ती व प्रतिमांचे सादरीकरण हे विशेष लक्षवेधी होते. त्या प्रतिमांकडे नजर गेल्यावर भाविकांच्या मनात भक्तिभाव निर्माण होऊन, जणू काही साक्षात दर्शनच झाले आहे, असा अनुभव या ठिकाणी येत आहे.